शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

मंगळवार, १७ मार्च, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १

 I Iश्री गणेशाय नमः ll

I lअस्तित्व ll

                                 - लेखक : निशिकांत हारुगले 

घाट कुंतल कोल्हापूर जिल्यातील दक्षिणेतील भाग, अपरान्त कोकण प्रदेशास लागून असलेला भाग, या भागातील हिरव्या गर्द झाडीत वसलेलं गाव आसगाव, गावाच्या बाहेर शंभू माळ्याच्या आमराईतील झाडावर उर्मिला ही गावातील गणपत पाटलाची मुलगी चढलेली होती. ती वरून आंबे तोडून खाली टाकत होती. झाडाखाली उभा असलेली गायकवाडची जया वरून टाकलेले आंबे झेलत होती. वाण्याची प्रभावती खालच्या अंगाला उतरणीवर उभा होती. ती वाटेवरून कोण येतं का ते पहात होती. नरसू भटाची राजश्री बाजूला उभा होती. तिचे हात पाय थरथर कापत होते. ती जयाला मधून मधून आटप म्हणत होती. थोड्या बाजूला झाडातील गेचक्यात उभा राहून कुंभाराची लता रस्ता निरखत होती. तिला शंभू माळी काठी घेऊन येताना दिसला. त्याच्या पाठोपाठ जगन हसत, खिदळत येत होता. शंभू माळी बडबडत होता.

शंभू : “आजकाल पोरांपेक्षा या पोरीच वांड झाल्यात. आंबे उतरुन खायला सोकावल्यात, मेली ती शाळा सकाळची कशाला ठेवली सरकारने या दिवसात? त्या मास्तरांनाही काम नको, हे बघ जगण्या खरंच गेल्यात त्या.”

 जगन : “होय काका, मी माझ्या कानांनी ऐकलंय. त्या आडावर पाणी भरायला आल्या होत्या. तेव्हाच त्यांचं ठरलंय. ती उर्मी त्यांची सरदार आहे बघा.“

शंभू : “ ती गण्या पाटलाची पोरगी ना, जन्मताच आईला खाल्ली, व आता पोपट होऊन माझे आंबे संपवतीय काय ? सोडतच नाही तिला. “

वळणावर शंभू माळी दिसताच लताने ‘कुहू, कुहू’ इशारा केला. आवाज ऐकताच उर्मिला झाडावरून लगेच खाली उतरली. तोपर्यंत काढलेले आंबे गायकवाडच्या जयाने उतरणीवर उभा असलेल्या प्रभेकडे दिले. ती वेगाने विहिरीकडे गेली. व सर्व आंबे एका घागरीत टाकले. व ती डोईवर घेतली. दुपारची वेळ होती. कोणी पाणवठ्यावर नव्हते. दुसरी कळशी काखेत घेऊन ती वाटेला लागली.

माळी व जगण्या बागेत यायच्या आत त्या सगळ्याजनी उतरणीवरून पाणवठ्यावर आल्या. व आपल्या भरलेल्या घागरी घेऊन वाटेला लागल्या.

बागेत आल्यावर ताजी पाने एका झाडाखाली पडलेली होती. तसेच एक कैरी देखील शंभू माळ्याला सापडली. ती घेऊन ते दोघे पाणवठ्यावर आले. मुलींकडे पहात.

शंभू माळी : “ए चोरांनो, आंबे काढून खाताय काय?”

जया : “ काय मामा, कुणाला चोर म्हणताय?”

शंभू माळी , “ कुणाला म्हणजे तुम्हाला, माझा आंबा उतरला नव्ह, पाडाला आलेला.”

लता, “ कोण म्हणतंय, आम्ही तर बाई अडावर पाणी भरताव. “

शंभू, “ मला जगन्यान सांगितलंय, काय ग उमा तू या चोरांची सरदार नव्हं. चल तुझ्या बापाकडं.”

उमा , “ माळी काका उगाच नको ते आरोप नको, पुरावा काय?”

शंभू, “ हा काय, जगन्या आहे की पुरावा.”

( खिडमुड्या जगन पुढे आला. आणि काका फुगवून दाखवू लागला. )

उमा, “ ये चल, माग सर, वार आलं तर उडून जाशील. हा पुरावा द्यायला, हा काय कॅमेरा आहे का फोटू?”

 शंभू, “ मुकाट्याने आंबे दे. नाहीतर चल तुझ्या बापाकडे.”

 उमा, “ जावा की मग वाट माहित आहे ना वाड्याची, काय कंदील घेऊन मुराळी पाठवून देऊ.”

जगन्या, “ बघा काका, कशी उलट बोलते तुम्हाला.”

जया, “ जगन्या , हाड पाहिजेत नव्हं जाग्याला की ढकलू विहिरीत. “

जगन मागे सरला. व काकामागे उभा राहिला.

जगन, “ बघा काका चोर ते चोर, आणि वर शिरजोर.”

शंभू, “ चला दाखवतोच तुम्हाला माझा हिसका, चला तुमच्या घरी. “

लता, “ जावा पुढे, येतो पाणी घेऊन आम्ही.”

 शंभू, “ कशाला, डोक्यावर ओतायला.”

 जया, “ हो बसा की मड्यागत , अखंड घागरच ओतते.”

 लता, “ घागर कशाला ओततेस, सरळ मडकच फोड की.”

शंभू, “ काय नालायक कारट्या आहेत. जीवावरच उठल्यात माझ्या. थांबा दाखवतोच, जातोच प्रत्येकीच्या घरला.”

 शंभू व जगन तावातावानेच निघाले.

…… ….. ….

प्रसंग दुसरा

शंभू माळी व गगन पुढे तावातावाने निघालेले पाहून

प्रभा , “ आता काय करायचं ग.”

उमा , “ शंकध्वनी करायचा त्या जगन्याच्या नावानं?”

प्रभा, “ पण आंबे कुठे ठेवायचे?”

लता, “ ठेवायचे की सरला काकूंच्या पिंजराच्या व्हळीत.”

राजश्री, “ आता ग काय करायचे? त्यो घरलाच निघालाय, आमचा अण्णा चेचणार मला.”

जया, “ ये भित्री भागुबाई, गप्प बस, ये लता व प्रभा दोघी जाऊन आंबे लपवा. पळा जावा लवकर, या शंभू काकाला सांभाळतो आम्ही, पण हे भित्र, गप्प बसलं तर बरं.”

उमा, “ राजे हे बघ, किती कुणी म्हटलं तर ही कोरट्याची फुलं दाखवायची. दुसरं काही नाही. समजलं, नाहीतर वकशील सगळं. बघतोच या जगण्याला, नाही याचा बाजा वाजवला, तर नावाची उमा नाही. चला आता.”

 मुली आपापल्या कामाला लागल्या.”

 लता व प्रभाने जाऊन आंबे लपवले. व त्या सर्वजणी आपापल्या घागरी पाण्याने भरून घेऊन घरी निघाल्या.

…… ………… ………

पुढील प्रसंग

उमेच्या घराच्या अंगणात शंभू माळी कालवा करत गेला. त्याच्या मागे जगन उभा होता.

शंभूने जोराने हाक मारली.

शंभू माळी, “ ये गण्या बाहेर ये, तुझ्या लाडक्या पोरीने वानर टोळी गोळा करुन माझी आंब्याची बाग उजाडली.”

उमेचे बाबा आत ज्योत्यावर पाळण्यावर बसून झोके घेत पानाचा विडा खात होते. शेजारी पाटलीन उभा होती. त्याचा आवाज ऐकून.

पाटील, “ हा शंभ्या आणि का कोकलत आलंय.”

पाटीलीन, “ काय माहित, चला तर बघू.”

ती दोघे घरच्या बाहेर येतात. पाठोपाठ त्याची आई सुद्धा येते.

पाटील, “ ये, शंभ्या कशाला कोकलत आहेस दारात येऊन.”

शंभू, “ वा, पाटील हे आपलं बरं हाय, तुमचं, तुमच्या पोरींनं गरीबांचं नुकसान करावं, व तुमची वर दमदाटी, नाय खपवून घ्यायचा मी, सगळ्या गावाला बोंबलून सांगणार तुझ्या पोरीची करणी.”

गणपतराव पाटील, “ ए शंभ्या, गप काय बोलतोयस.”

शंभू माळी, “ अरे , गावकऱ्यानो, बघा याच्या पोरीनं माझा आंबा उतरला. अन् हा बघा कसा पाटीलकी करतोय.”

गणपतराव, “ ए माझ्या पोरींन तुझा आंबा उतरला यासाठी काय पुरावा हाय?”

( मागल्या जगन्याला पुढे बोलावत)

शंभू, “ ए , जगण्या सांग तेला?”

जगन, “ हो, हो, मी माझ्या कानांनी ऐकलंय, त्या पाणवठ्यावर बोलत होत्या.”

गणपतराव, “ हे बघ, तू ऐकलास ना, मग त्यांना आंबे काढताना पाहिलंस का?”

 जगन, “ नाही बुवा.”

 गणपतराव, “ हे बघ, शंभू ऐकने व पाहण्यात चार बोटांचं अंतर असतं. व पाणी भरायला गेलेल्या मुली आंबे कशाला काढतील. तरी पण घरी आल्यावर बघू.”

शंभू, “ हे आपलं बरं हाय पाटील, मला सांगा, जवळ विहीर असताना तुमची पोर तिकडं पाणी भरायला कशाला गेली.”

शंकुतला, “ हे बघा, शंभू भाऊ, पोरींनं पाणी कुठं भरायच, ते आम्ही ठरवू, पोरींनं जर आंबे काढले असतील तर मी तिला शिक्षा करेन. आणि जर तिच्याकडे आंबे सापडले नाहीत तर मग तुलाच त्या आंब्याला उलटा टांगून नाय मिरचीची धुरी दिली तर नावाची शकुंतला नाय मी.”

तेवढ्यात त्या सर्वजणी एकामागोमाग एक हजर होतात. उर्मिलेच्या डोक्यावर पाण्याची घागर होती. तिच्या ओढणीच्या ओटीत काहीतरी होते. त्या सर्वजणी आपापल्या घागरी घेऊन उभा होत्या. राजश्रीच्या ओट्यात देखील काहीतरी होते. शंभूचा कालवा ऐकून गल्लीतील सर्वजण गोळा झाले होते. इतक्यात शंभू माळी म्हणाला, “ बघ, तिच्या ओट्यात काय ते?”

शकुंतला, “ कारटे कुठे उलतली होतीस. जवळ विहीर असताना तिकडे कशाला गेलतीस कलमडायला, आणि ओट्यात काय हाय?”

शकुंतला पुढे होणार तोच शंभू माळी पुढे झाला. व तिचा ओटा खुला केला. त्यातून कोरट्याची फुले खाली पडली. तशी डोईवरील घागर शेजारच्या सुलभा मावशीकडे देत.

उर्मिला, “ बघ ना ग, आई कसा हिसडा मारतोय, माझी फुलं पाडली बघ.”

तशी शकुंतला पुढे होत,

“ ये, गाभ्या फणसा, बघितलास नव्हं, फुलं होती ते. आणि चोर म्हणतोस व्हय र…. माझ्या पोरीला म्हसोबा, तुला सोलीन नारळ सोलल्यासारखा. दोन चार आंब्यापाई माझ्या पोरीला बोल लावतोस व्हय. जा पेटून पडू देत तुझी बाग ती, नाय ग माझी बाय ती रडू नकोस.”

शंभू, “ नाटकं करत्यात, ये राजे तुझ्याकडं असतील आंबे,”

( शंभू पुढे झाला. व त्याने राजश्रीच्या ओट्यावर हात मारला. तिच्या ओट्यातील चिंचा खाली पडल्या. तशी राजश्री रडू लागली. तेव्हा राजश्रीची आई बोलली.)

“ ये शंभ्या चिंचतला अन आंब्यातल फरक कळतोय की नाही. काय म्हणते मी, गोटीवानी डोळं दिल्यात ना देवानं. मीच सांगितल्या होत्या. वाटेवरील चिंचेच्या चिंचा अणायला. नालायक कुठला? भटाच्या पोरीला हात लावायला. सत्यनारायण तरी पावलं का तुला?”

 शंभू, “ लई खऱ्याच्या पुतळ्या असतील ना या, तर शपथ घ्यायला सांग.”

 उर्मिला, “ हो, घेते मी, माझ्या मेलेल्या आईची शपथं.”

 शंभू, “ काय बिलंदर आहे हो कारटी, मेलेल्या आईची शपथ घेतेय. या जित्या आईची घे.”

 शकुंतला, “ये मेल्या, माझ्या जीवावर उठलास होय. घेत नाय जा ती शपथ. तुझे आंबे गेले आडीत. जा शोध जा, माझ्या मरणावर उठलाय. जीवनाची रांगोळी केली मी या पोरीसाठी, हिचा वनवास नको म्हणून भनीमाग हा बिजोरा नव्हरा गळ्यात बांधला माझ्या. आणि आता तू आलास व्हय र, मुळावर माझ्या. गुमान जा, नाहीतर डोचकीचा आंबा फोडीन तुझ्या.”

क्रमशः पुढे .....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अस्तित्व पटकथा भाग ९

  अस्तित्व पटकथा भाग ९ अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film, क्रमशः पुढे चालू ........ उमाचा रिझल्ट ला...