अस्तित्व भाग २
क्रमशः पुढे........ चालू...
गणपतराव, “ आता इथं लग्नाचं काढायची काही गरज आहे का ? ये बोल शंभ्या तुझं किती पैसे ते? आता मारतो तोंडावर तुझ्या”
( गणपत पाटील पैसे देतोय म्हंटल्यावर शंभू पुढे येतं होता. इतक्यात शकुंतला मधी बोलली.)
शकुंतला, “ अय , लई पैसे नाचवू नका, व ये शंभ्या एका रुपयाला जरी हात लावलास तर हात तोडीन, मग आंबे मोजायचे सोड तुला पाटवान सुद्धा धुवायला यायचं नाही. “
शकुंतला झटकन पुढे गेली. व नवऱ्याच्या हातातले रुपये हिसकावून घेतले.
शकुंतला, “ आणा इकडं ते वाण सामान आणायचं आहे.”
शंभु कडे पाहून तिने मुरका मारला. व त्याला म्हणाली,
“ शंभू महाराज , चला घर गाठा, आता. आंब्याच मुरून लोणचं झालं की पाठवून देऊ घरला.”
शकुंतला उर्मिलेजवळ जात,
शकुंतला, “ चल ग कारटे, सुगंधा ती घागर घे आत, सकाळच्या पाळी कुणा कुणाची तोंड बघायला लागतात. चल नालायक कुठली.”
बाकीचे सर्वजण आपापल्या मुलींना घेऊन घरी जातात. शंभू पण निघून गेला. थोड्या वेळाने शकुंतला पाटलीनीनं उमेला जेवायला वाढलं. ती जेवली, जेवण झाल्यावर.
शकुंतला, “ काय झालं का जेवून?”
उमा, “ हो, झालं की.”
शकुंतला, “ मग सांग, आंबे काढलेस की नाही.”
उमा, “ छे ग, कुठले आंबे. तो जगन्या थापाडा, काय पण सांगतोय.”
शकुंतला, “ हो का, मग शंभू काका तर ठारंच वेडा असणार. अन् तू तेवढी शहाणी माझी बाय ती.”
उमा, ( लाजत खाली मान घालून.)
हो.
( इतक्यात चुलीतील तापलेले उलातणे काढून जोराचा चटका उमेच्या पायाला दिला. ती ओरडली. काय झालं म्हणून गणपती पाटील पाळण्यावरुन खाली उतरुन आत आला. उमा रडत होती. तिच्या पायातून वेदना होत होत्या. ते पाहून. )
गणपतराव, “आवागलीस काय? अस तरण्या ताठ पोरीला कुणी भाजतं का?”
शकुंतला, “ हो अवागलेय, ही त्या शंभ्याला गंडवू शकेल मला नाही. सांग गेलतीस की नाही आंबे आणायला.”
उमा, “ नाही जायला, आबा वाचवा मला. आई बघा कशी मारतेय.”
शकुंतला, “ ये, या शेंड्या दुसऱ्या कुणाला तरी लाव.”
गणपतराव, “ अहो, एवढ म्हणते तर गेली नसेल. तुम्ही पण उगाच कुणाचं तरी ऐकून पोरीला मारता .”
शकुंतला, “ उगाच नाही मारत, एवढी दुधखूळी नाही मी. नव्या पोलक्यावरील हे आंब्याच्या जराचे डाग व गाभोळल्या आंब्याचा वास कळतो मला. मी पण घाट कोकणाचीचं आहे हो. मला खोटं बोलतीस, घरच्या आंब्याची झाडे नाहीत का? ते तिकडं कलमडलीस, मला विचारायच्या आधी बाहेर गेलीस तर डोकल्या मोडून ठेवीन. अन् कुणा पांगळ्याच्या गळ्यात बांधीन.”
( इतक्यात मागल्या दराने महादेवाच्या देवळातून आलेल्या म्हातारीला उमेच्या हुंडक्यांचा आवाज ऐकू आला. ती आत आली. उमेला रडताना पाहून तिच्याजवळ जात.)
आऊ, “ उमा, रडायला काय झालं? कुणी काय केलं? ते सांग मला.”
उमा, “ आईनं भाजलं.”
आऊ, “ काय भाजलं, गण्या ये गण्या.”
गणपतराव आत आले.
आऊ, “ काय चाललंय तुझ्या बाईचं. तिला म्हणावं म्हातारी जीत्ती हाय अजून. तुमच राज येऊ द्यायची नाही. माझ्या नातीला भाजती. जा म्हणावं माहेराला.”
शकुंतला, “ अहो, तुम्हाला सांगते, गप्प रहा म्हणावं, म्हातारीला. नाहीतर आता पोचवा मला माहेरी. “
आऊ, “तिथं ठेवलय, डबोलं तुझ्या बापानं. जा उकरून खा जा. पोरीला का भाजलस ते सांग आधी.”
शकुंतला, “ त्या देवळात जाऊन चकाट्या पिटण्यापेक्षा जरा नातीकडं लक्ष द्या म्हणावं. लोकांची आमराई उतरुन आलिया.”
आऊ, “ कोण ,म्हणतं. “
शकुंतला, “ तो शंभ्या आला होता कोकलत, इथवर, नको ते बोलतं होता. कोण सहन करणार?”
आऊ, “ गावाला काय शेंडा न बुडका, तू का गं हलक्या कानाची.”
शकुंतला, “ हलक्या कानाची बरी असेन, बयेचा ड्रेस बघ, कसा डागाळलाय.”
म्हातारी, “ कशाऊन ते आंब्याचे डाग, तू सांगतेस म्हणून, बडी संशोधक झालीस की.”
शकुंतला, “अहो, तुम्हासनी सांगते, त्या म्हातारीच्या तोंडाला कुलूप लावा. नाहीतर मी निघाले.”
आऊ, “ तू बरी जाशील. अन् ह्यो खटारा काय तुझी आवशी सांभाळलं काय?”
शकुंतला, “ तीनच ह्यो घाणा घातलाय, व मला इथं दिली.”
गणपतराव, “ ये बायांनो गप्प बसा आता. घरात शांती नंदू देत.”
तशा त्या दोघी गप्प बसल्या. उमेच्या मैत्रिणी दारा आडून वाकून बघत होत्या.
लता, “ काय झालं असलं ग.”
जया गायकवाड, “ काय झालं म्हणजे, काकूला कळलंय, उमेला भाजलं नव्हं.”
प्रभा, “ बिचारी उमा, हे सगळं त्या जगन्यामुळं झालंय.”
राजश्री, “काय पण होऊदेत, त्या जगन्याला सोडायचा नाही.”
लता, “ सोडायचा तर नाहीचं, पण चांगली अद्दल घडवायची.”
…… ……. ….. ….
क्रमशः पुढे.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा