क्रमश पुढे.......
संध्याकाळी शाळा सुटल्यावर शकू घरला जाताना लता दारात उभा होती. शकू येताच आतमध्ये जाऊन लता एक बाटली खिशातून घेऊन आली. व ती गुपचुप तिने शाकूकडे दिली. शकू घरला गेली.
इकडे शाळा सुटल्यावर राजश्री घरी आली. तिची आई वाती वळत होती. तिला
राजश्री, “ आई मला उद्या डब्यात प्रसादाचा शीरा दे. “
आई, “ शीरा, कशाला हवाय.”
राजश्री, “ पाहिजे एक मुलगी गरीबाची हाय. ती म्हणाली तिला शिरा खावासा वाटतो ग. मी म्हटले, उद्या आणते.”
आई, “ अगं, केव्हा पण करायचा का प्रसादाचा शीरा.”
राजश्री, “ ये, तू देणार की नाही बोल, दशमीला नैवेद्य करायला जोर असतो तुला, व मला द्यायला नाही.”
इतक्यात बाहेरून राजश्रीचे बाबा आले. ते न्हाणीघरात पाय धुताना.
राजश्रीचे बाबा, “ अहो, ऐकलंत का?”
आई, “काय ते?”
बाबा, “ उद्या नेवेद्य लागेल.”
आई, “केवढ्याचं करायचं.”
बाबा, “ आपल रोजच्या सारखं, दशमी आहे हो वाडीवरल्या तुकाराम डोईफोड्याची, त्याची आवशी निवर्तली ना.”
आई, “बर करते, पण वाण सामानास पैसे हवेत.”
राजश्रीचे बाबा, “ ठेवलेत तिथे डब्यात, त्यातून घ्या.”
आई, “ बर बरं.’
राजश्रीची आई तिच्याकडे पाहून हसली.
आई, “ देव पावला ग बाई तुला, देते जा उद्या, पण आता माझं ही एक काम करायचं.”
राजश्री, “ कोणतं गं?”
आई, “ अंगण झाडून काढ, व दोन – तीन घागरी पाणी त्या न्हाणीघरातील डेर्यात ओत. मगच मी तुझं काम करेन.”
राजश्री, “ पक्की जातीची बामणीन आहेस हं.”
आई, “ हो का, हे आपलं बरं आहे की, ती उमा बघ स्वयंपाक ही करते. नाहीतर तू, पोळ्या तरी जमतात का?”
राजश्री, “ जमतील की येत्या मे महिन्यात, दहावी झाली की उमा शिकवणार आहे. आम्हाला सगळं काही.”
आई, “ हो का, बरं झालं बाई, देव पावला म्हणायचा. एकदासा, “
राजश्रीने मुरका मारला. व ती कामाला लागली.
…… …… …..
दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना राजश्रीच्या आईने राजश्रीला एक डब्बा दिला. त्यात नैवेद्याचा शिरा होता. तो घेऊन ती शाळेला निघाली. वाटेत एक एक करत सर्व मैत्रिणी जमा झाल्या. वाडीवरल्या विठू मांगाच्या पोरीने एक बाटली त्यांना दिली. ती उघडून त्यांनी बघितली. थोडं वाटेवर बाजूला जाऊन उपवासाच्या शिऱ्यात त्यांनी ते थोडं पेय मिसळले. व त्या शाळेत गेल्या. जाण्यापूर्वी वाटेत सर्व योजना केली. शाळा भरली. प्रार्थना होऊन तासिका सुरू झाल्या. दुपार झाली. मधली सुट्टी झाली. वर्गातली मुले बाहेर गेली. जगन मागील बाकावर होता.
राजश्री, “लता कुणाला सांगू नकोस हा, माझ्या डब्यात नैवेद्याचा शिरा आहे म्हणून, नाहीतर सगळ्या संपवतील.”
त्यांचे बोलणे जगनने ऐकले.
लता, “ चल सांगत नाही, जरा बाहेर जाऊन येऊ व शिरा खाऊ.”
त्या बाहेर गेल्या. व खिडकीतून वाकून पाहू लागल्या. जगन जागेवरून उठला. व कोणी वर्गात नव्हते याचा अंदाज घेऊन राजश्रीच्या बॅगे जवळ गेला. व डब्बा काढून त्याने बकाबक शिरा खाल्ला.
जगन, “वाह, मस्त आहे.”
त्यानी खिडकीतून पाहिले व उमेला जाऊन सर्व हकीकत सांगितली.
लता, “ उमा , काम फत्ते झालं.”
उमा, “ काय खाल्ला शिरा, मग आता काय जगन हवेतच.”
थोड्या वेळाने बेल झाली. वर्ग पुन्हा भरले. इतिहासाचा तास चालू झाला. सर शिकवू लागले. जगनला थोड्या वेळानंतर धुंदी चढायला लागली. जगन जाग्यावरुन उठला.
जगन, “काय शिकवताय बोडके सर, इतिहास काय? मग मला एक विचारायचं आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याच उत्तर द्या.”
बोडके सर, “जगन्या शुद्धीवर आहेस ना, कुणाला बोलतोयस. “
जगन, “तुला रे मास्तुर्या, सांग मला नेपोलियन बोनापर्टच्या आईचे नाव काय?”
बोडके सर, “जगन्या फालतू प्रश्न विचारू नकोस?“
जगन, “ मास्तुर्या, तूच प्रश्न विचारतोस ना, मग ज्याचा उपयोग नाही तो इतिहास का शिकवतोस.”
बोडके सर, “ काय बोलतोयस तुला कळतेय का? भांग प्यालास काय?”
जगन, “नाय, मी भांग प्यायलो.”
जगन तिथून उमेच्या जागेवर आला.
जगन, “ये उमे, आंबे चोर, सरला काकूंच्या व्हळीत आंबे लपवतेस काय? आंबे कुठे गेले याचा विचार करतेस का? मी चोरले, ते ग्वाड ग्वाड आंबे, तुला सांगणार नाही म्या कुठे लपवले ते? माळ्यावरच्या कनुगल्यात हा s s हा s s…..”
जगन धडपडत वर्गातून बाहेर पडला. व त्याने शाळेची घंटा वाजवली. मुलांना वाटले शाळा सुटली म्हणून ती सर्व घरला पळाली. मास्तर जगण्याच्या पाठी लागले.
बोडके मास्तर, “जगन्या भोपळ्या.,.. थांब दाखवतोच.” तो धडपडत शाळेतून बाहेर पडला. व गावात आला. गावात त्याला शंभू माळी दिसला. त्याला पाहून
जगन, “ ये शंभू, बागवान कुठला? दोन आंबे काय काढले पोरिंनी, त्यांना बोलतोस व्हय. हत्ती कुठला? राहिलेले आंबे काय मेल्यावर
डोंबलावर बांधून फिरणार आहेस काय? म्हणून लेका वेशीवरल्या महादेवन तुला अपंग पोरं दिलंय बघ.”
हे ऐकताच शंभू माळी, “ जगन्या मला बोलतोस व्हय रं.”
असे म्हणून तो जगनच्या अंगावर धावून गेला. सर्व लोकांनी त्याच्या तावडीतून जगनला सोडवला. व जगनला उचलून घरी नेला. सर्व लोक जमा झालीत.
जगनची आई, “ काय झालं व पोराला.”
जगनचा बाप, “ दिसत नाही मूत् प्यायल्यावाणी बरळतोय, दिसतं नाही तूस.”
जगनची आई, “ आव, काय खाल्ल व पोरानं.”
जगन, “ काय नाही ग, प्रसादाचा शीरा खाल्ला बघ.”
जगन्याची आई, “ ये राजे, तूच कायतरी घातलीस बघं माझ्या पोराला.”
राजश्री घाबरली. ते पाहून
लता, “ ये जगन्याचे आई, त्याला काय आम्ही शिरा दिला नव्हता. चोरट्यांन चोरुन डब्बा खाल्ला असणार.”
जगण्याची आई, “काय मंतर घातलाय काय त्यात.”
गर्दीतून एकजण
“ शिरा खाऊन का कोणी झिंगत का? हे तर दुसरच कारण हाय.”
इतक्यात राजश्रीची आई, “ ऐ बाय, भटाच्या घरात कावून आम्ही घालू. व तुझ्या पोराला गुंगी चढायला तोच शीरा मी दशमीला दिला. ते आहेत ना नीट. मग तुपालंच पोरगं कसं झिंगल. व ये राजे, या मेल्यास शिरा का दिलास.”
राजश्री, “अगं आई मी नाही दिला. यानेच चोरला. चोरटा कुठला? अन् यानेच शंभू माळ्याचे आंबे पण चोरले.”
जगनची आई, “ये बाय, कायपण आरोप करतेस. ग.”
उमा, “ जाऊन बघ जा, माळ्यावरील कनुगल्यात लपवलेत ते.”
इतक्यात शेजारील गुंड्या माळ्यावर गेला. व कनुगल्यातील आंबे काढून घेऊन आला. आल्यावर.
गुंड्या, “ हे बघा सापडले.”
शंभू माळी, “ जगन्या तू चोर व त्या पोरींवर नाव घालतोस व्हय रं. “
जगन्याच्या बा कडे पाहत.
शंभू माळी, “जगन्याच्या बाप्पा, द्या माझ्या आंब्यांचे पैसे.”
जगनचा बाप, “देत नाही जा. काय करणार?”
शंभू माळी, “कोर्टात खेचीन. तूस”
इतक्यात शकुंतला पाटलीन, “ ऐ शंभ्या, चार दिवसापूर्वी दंगा घातलास, अन् म्या माझ्या पोरीला भाजलं. मेल्या इथंन गप्प जा नाहीतर आंब्यासकट तुझं लोन्चच घालते बघ.”
लताची आई, “ दही चारा तेला, उतरलं.”
एक बाई, “ लताच्या आई, अनुभव हाय म्हणायचा.”
लताची आई, “ डोंबलाचा अनुभव, आमचं हे प्यायलं, की दही काय दह्याचं रांजण जरी ओतला तरी त्या बाबाची काय उतरायची नाय.”
जगनला घरात बाजेवर झोपवले गेले. त्याला दही चारवले गेले. मुली खुदू खुदू हसत बाजूला गेल्या.
उमा, “ बघितलीस का? काजूची फेणी कशी चढली की नाही. जगनला, चला झालं काम.”
त्या बाजूला जाऊन हसू लागल्या. टिंगल करू लागल्या.
प्रभा, “जगन्या भारी बोलला. नाही.”
जया, “ये शंभू, हत्ती. हा.. हा …हा….”
लता, “ मास्तरांची तर पॅन्टच निसटली. नेपोलियन बोनापार्टची आईचे नाव काय विचारल्यावर?”
उमा, “ये गप्प बसा, कोणीतरी ऐकेल, चला आता जाऊया.”
त्या निघून गेल्या.
…. …… ….. ……
क्रमश पुढे .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा