अस्तित्व पटकथा भाग ८
अस्तित्व पटकथा भाग ८,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू.......
संध्याकाळी घराच्या अंगणात आई, मल्हारी व मुले एकमेकास तेल चोळत होते. मल्हारी शेवटी होता. आई डोक्यावर मल्हारीच्या तेल घालत होती.
लक्ष्मीबाई, “ मल्हारी विचार न करता छोट्या छोट्या गोष्टींसाठी असा जीव धोक्यात घालणं बरं नव्हे.”
मल्हारी, “ आई, छोट्या गोष्टीतूनच मोठ्या घटना घडत जातात.”
लक्ष्मीबाई, “ लई, शहाणा आहेस.”
मल्हारी, “ शहाणा अस काही नाही. पण बुद्धिमान म्हणालीस तरी चालेल. जर आज मी हे धाडस केलं नसतं, तर रोज एखादा चोर घरी, दारी, रानात, शेतवडीत चोरी करू लागतील. डाके घालू लागतील. कारण एकदा मऊ लागलं. की बरेच ससे चरायला येतील.”
लक्ष्मीबाई, “बराच ठग आहेस की?”
कार्तिक, “ ठग म्हणजे काय रे काका?.”
मल्हारी, ( कार्तिकाचे डोके चोळत) अरे, ठग म्हणजे असा हुशार माणूस जो तुम्हाला फसवून आपले काम फत्ते करुन गेलेला ही तुम्हाला कळणार नाही.”
लक्ष्मीबाई, “बर चला खूप झाली तेल मालिश. मला खूप कामे आहेत.”
कार्तिक, “तू गप्प बस, कामे करतील आई व काकी.”
( सर्व हसू लागले.)
…… ….. …….
स्वयंपाक घरात जेवण करत होत्या. एक भाजी चिरत तर दुसरी फोडणी देत होती.
सरस्वती, “पाहिलंस मामांजीनी घराण्याची चेन धाकल्या भाऊजींना दिली.”
पार्वती, “हो बघितलं. सासूबाईंचा लाडका आहे ना. खूपच लाड चाललेत.”
सरस्वती, “आमच्या यांना कळतच नाही. मागच सांगत होते वेगळे होऊ म्हणून. तर एक नाही की दोन नाही. या घरात जेवण करतच म्हाताऱ्या होऊ.”
पार्वती, “ तर काय, सगळा व्यवहार मामांजीकडे, आता तरी मुलांच्या हातात सत्ता द्या म्हणावं.”
सरस्वती, “आमचे हे उत्तम शेत सांभाळतील.”
पार्वती, “ आमच्या ह्यांना काय जमत नाही हो, पण द्यायला तर हवं.”
( इतक्यात स्वयंपाक घरात प्रवेश करत.)
लक्ष्मीबाई, “ झाला की नाही स्वयंपाक अजून.”
( त्या बोलणे थांबवून.)
पार्वती, “हो होतेय.”
लक्ष्मीबाई, “हा हात हलवा लवकर, ती मोलकरीण बाकीचे धुणे, पाणी , झाडलोट करते. तुम्हा दोघींना साधं जेवणही जमत नाही का लवकर करायला. काय माहेरी शिकवलच नाही.”
सरस्वती, “ हे काय, झालंच, थोडा वेळ आणखीन.”
लक्ष्मीबाई, “जेवण करताना बडबड कमी व हात हलवले की होते लवकर.”
लक्ष्मीबाई, “आणखी एक सांगायचंय तुम्हाला, व्यवहारचं म्हणाल तर, एकवेळ तुमच्या मुलांच्या हातात जाईल. पण तुमच्या नवऱ्यांच्या विसरा. साधं खंडभागाच्या शेतातून खंड मोजून आणता येत नाही. तिथं बाकीचा व्यवहार सोडाच. व राहता राहिला मल्हारीचा प्रश्न, त्याने दोन वर्ष नियोजन हाती घेतलं. म्हणून तुमच्या नवऱ्यांनी नको ते नाद करुन केलेली देणी भागवून घर चालवलं. तस पहायला गेल तर इथं त्या देण्याची तुलना करता तुमच्या वाट्याला एकर भर रान सुद्धा येणार नाही. घर भांडी सोडाच.”
लक्ष्मीबाई, “ तुमचा दीर प्रेमळ आहे, म्हणून नाहीतर एखाद्याने तुमचे हे थेर बघितले असते. तर केंव्हाच घरातून बाहेर हाकलले असते. त्या मुलांकडे पाहून सहन करतोय सगळं, त्यामुळे इथून पुढे जीभ सांभाळून.”
लक्ष्मीबाई, “आणखी चेनेच बोलत असाल, तर तो होता म्हणून ती चेन घरात आली. तुमच्या नवऱ्याच्या हातात असती तर आतापर्यंत नाचणारीच्या पायावर गेली असती. लागा कामाला.”
सुनांना सुनावून ती बाहेर आली. हॉलमध्ये आल्यावर.
सदाशिवराव, “सुनांना बोलल्याशिवाय चैन पडत नाही का तुम्हाला?”
लक्ष्मीबाई, “त्या आहेतच त्या गुणांच्या, मघाशी चैन मल्हारीला दिली तेव्हा तोंड पहिलीत का त्यांची.”
सदाशिवराव, “स्त्री सुलभ सोन आवडायचं त्यांना.”
लक्ष्मीबाई, “मग या जावा म्हणावं माहेराहून घेऊन, नाहीतर नवऱ्यांना राबवा म्हणावं आपल्या, अन् घाला म्हणावं कमवून सोनं.”
सदाशिवराव, “शांत हो, ऐकलं तर काय वाटेल त्यांना.”
लक्ष्मीबाई, “वाटू देत काय वाटायचं ते, मला नाही येतं दया, लहान लहान मुले सासरी ठेवून माहेराला जाऊन चैन करणाऱ्यांना पायाखालीच ठेवलं पाहिजे. अन् हो तुम्हाला जर का एवढा पुळका असेल तर जावा आत मदतीला. तुम्हाला कामाला लावून बाजूला जाऊन बसतील त्या.”
इतक्यात शांताबाई तिथे आली.
शांताबाई, “ मालकीण बाई, थोडं पैसे हवे होते.”
लक्ष्मीबाई, “किती हवेत?”
शांताबाई, “ दोन हजार.”
लक्ष्मीबाई, “ थांब देते.”
लक्ष्मीबाई आत खोलीत जाऊन पैसे घेऊन आली. व तिला दिले.
लक्ष्मीबाई, “ हे घे, अन् हो जाताना बाहेरील बाकड्यावर केळी काढून ठेवली आहेत. जाताना जा घेऊन , नाहीतर जाशील तशीच.”
शांताबाई, “ बरं “
शांताबाई निघाली. जाताना केळी घेऊन गेली.
…… …. …….
क्रमशः पुढे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा